आषाढ वारीसाठी शिवछत्रपतींच्या पादुकांचे शिवनेरीहून प्रस्थान   

बेल्हे,(प्रतिनिधी) : भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणार्‍या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने रविवारी प्रस्थान केले.श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक, रुद्राभिषेक झाल्यानंतर मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून,महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक १ हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.
 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या ३५१ व्या वर्धापन वर्षात शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका आज मंचर, खेड, चाकण, वढू बुद्रुक मार्गे श्रीशंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात पहिला विसावा घेतील.श्री शिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद गुरुजी याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना २०२०-२१ लाही श्रीशिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. आषाढी वारीच्या निमित्ताने शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, वढू बुद्रुक, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. शिवछत्रपतीं च्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे ११ वे वर्ष तर परंपरेचे ३१ वे वर्ष असल्याचे सांगितले.
 
शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यंदा सचिन ढोमसे, गोरख जांभळे, रवींद्र सोनवणे, रोशन कदम, विनायक जांभळे, संजय बोळीज, रामनाथ ढोमसे यांच्या गटाला मिळाली आहे.सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर प्रतिष्ठानचे संदीप ताजणे, गोरक्षक शिवराज संगनाळे, लंबोदर प्रतिष्ठानचे मयूर मेहेर, सौरभ तोडकर, हाय स्पीड अभ्यासिकेचे अनिकेत कुटे, ऋशाल आमले यांनी परिश्रम घेतले.
 

Related Articles